साहस,पराक्रम आणि जाज्वल्य हिंदुत्वाचे प्रतिक असणारे श्री शंभुछत्रपति म्हणजे आमच्या राष्ट्रजीवनाचा एक तेजस्वी अध्याय!! ज्या वयात आजचे तरुण करिअर आणि भविष्याच्या चिंतेने सैरभैर होतात,त्या वयात शंभुराजांनी जगातल्या महाबलाढ्य मुघल साम्राज्याशी लढा दिला. छत्रपति शिवरायांच्या काळात औरंगजेब कधीही दक्षिणेत आला नाही ,पण शंभुराजांचा सामना थेट बादशाह औरंगजेबाशी झाला. जगाच्या इतिहासात एकमेव उदाहरण ठरावे एवढ्या धीरोदात्तपणे ते मृत्युला सामोरे गेले. वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी त्यांनी देव,देश आणि धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
तीन लक्ष घोडदळ,चार लक्ष पायदळ,शेकडो हत्ती,हजारो उंट असे प्रचंड मोठे दळबदळ घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात उतरला होता. स्वत: औरंगजेबाने काफीर मराठ्यांविरुध्दच्या या महामोहीमेला "जिहाद" असेच म्हटलेले आहे. "मुसलमानांना अल्लाहच्या मार्गात जिहाद करणे हे त्याचे आप्तेष्ट ,नातेवाईक आणि त्यांचे व्यापारउदीम व मालमत्तेपेक्षाही अधिक प्रिय असते" असे कुराणाच्या सूरह 9 आयत क्र- 24 मध्ये सांगितलेले आहे. कुराणाच्या सूरह 2 आयत 190-193 नुसार "इस्लामच्या रक्षणासाठी व स्वरक्षणासाठी युध्द अनिवार्य आहे"
जिहाद म्हणजे निरंतर इस्लामिक युध्दाचा सिध्दांत आहे. यासंदर्भात विश्वसनीय मानल्या गेलेल्या पुढील काही हदीस पहा -
अ) अल्लाहच्या प्रेषितांना (मुहंमद पैगंबर ) विचारले गेले की, " या जगात सर्वोत्तम कार्य कोणते आहे?" त्यावर प्रेषित (मुहंमद पैगंबर) उत्तरले , "अल्लाहवर आणि त्याच्या प्रेषितावर ( मुहंमद पैगंबर ) श्रद्धा ठेवणे" प्रश्नकर्त्याने पुढे विचारले, "या नंतरची दुसरी चांगली गोष्ट कोणती आहे ?" त्यावर प्रेषित (मुहंमद पैगंबर) उत्तरले , "अल्लाह साठी केलेल्या जिहाद मध्ये म्हणजेच धर्मयुद्धात (प्रत्यक्ष युद्धभूमीवरील) सहभागी होणे."- सहीह बुखारी खंड १, पुस्तक दुसरे, हदीस २६
https://sunnah.com/bukhari/2/19
ब) अम्र बिन अबासा याने कथन केले की, "मी प्रेषितांकडे गेलो आणि त्यांना विचारले की, "सगळ्यात उत्तम जिहाद कोणता ?" तेव्हा प्रेषित उत्तरले, "ज्यामध्ये माणसाचे रक्त सांडेल आणि त्याचा घोडा जखमी होईल असा जिहाद हा सगळ्यात उत्तम आहे. " - सुन्नान इब्न मजाह २७९४
https://sunnah.com/urn/1276430
क) प्रेषित म्हणाले , " सर्व माणसांमध्ये सगळ्यात उत्तम माणूस कोण आहे हे मी तुम्हाला सांगू का ? जो माणूस अल्लाह साठी जिहाद करायला आपल्या घोड्याचा लगाम हातात घेतो तो."- अल मुवत्ता २१:१:४
ड)प्रेषित मुहम्मद म्हणाले , " जो पर्यंत सर्व धर्माचे लोक ,'अल्लाह हाच एकमेव देव आहे आणि मुहम्मद हा त्याचा प्रेषित आहे' हे मान्य करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याशी लढत राहण्याचे आदेश मला (अल्लाह कडून ) मिळालेले आहेत." - सहीह मुस्लिम १:३३
https://sunnah.com/muslim/1/33
वरीलप्रमाणेच असंख्य उदाहरणे कुराण व हदीस या इस्लामच्या प्रमुख ग्रंथांमध्ये सापडतात. हिंदवी स्वराज्य म्हणजे काफीरांचे राज्य,या राज्याशी लढणे म्हणजे औरंगजेबासाठी इस्लामिक जिहादच होता.
21 नोव्हेंबर 1681 रोजी औरंगजेबाने बुरहानपुरच्या अब्दुल लतिफच्या दर्ग्यास भेट दिली आणि "इस्लामचा शत्रु" असलेल्या संभाजीविरुध्द आपल्याला यश मिळावे अशी प्रार्थना केली. ही महामोहीम काढण्यात माझा हेतू फक्त जिहाद आहे, माझ्या या सेवेने अल्लाह प्रसन्न होवो, अशी त्याने घोषणा केली.
मराठ्यांच्या स्वराज्याचा संपूर्ण नाश आणि काफरबच्चा संभास ठार करणे हा उद्देश ठेवून औरंगजेबाने जिहाद सुरु केला. पण त्याला शरण जातील ते शंभुराजे कसले? "अहद तंजावर ते तहद पेशावर" हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणार्या पुण्यश्लोक शिवछत्रपतींचे ते सुपुत्र होते. "आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य" असे म्हणून आपल्या आबासाहेबांचेच स्वप्न आणि वारसा घेऊन शंभुराजे सर्वशक्तीनिशी औरंगजेबाविरुध्द उभे राहिले.
नाशिकजवळीळ रामसेजसारखा छोटासा किल्ला! औरंगजेबाने शहाबुद्दीन फिरोजजंग याला सुमारे चाळीस हजार फौज देऊन रामसेज किल्ला जिंकण्यास पाठवले. गडावर अवघे पाच-सहाशे मराठी सैन्य होते. महिना झाला तरी रामसेज मुघलांच्या हाती लागला नाही, उलट शंभुराजांची फौज मुघल सैन्यावर तूटून पडली.मराठ्यांनी हजारो मुघल कापून काढले. घोडे पळवले आणि प्रचंड लूट केली. पाच वर्ष झुंज देऊनही रामसेजसारखा छोटासा किल्ला औरंगजेबाच्या हाती लागला नाही. वैतागलेल्या औरंगजेबाने आपला बादशाही किमाॅश (पगडी) जमिनीवर आपटला आणि "त्या काफरबच्चा संभाजीला ठार मारल्याशिवाय पगडी घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली.
शंभुराजांचे सैन्य तुलनेने कमी होते. तरीही त्यांनी मुघलांच्या लक्षावधी फौजेविरुध्द जो संघर्ष केला ,त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.....हा संघर्ष फक्त मुघलांशीच नव्हता.गोव्याचे पोर्तुगिज, जंजिरेकर सिद्दी यांच्याशीही होता. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर शंभुराजांना संघर्ष करावा लागला. गोव्यातील पोर्तुगिज हिंदुचा धार्मिक छळ करत होते. हिंदुंना जीवंत जाळणे,तळून काढणे असे अमानुष प्रकार गोव्यात सुरु होते. हिंदुंना बळजबरी ख्रिश्चनधर्म स्वीकारण्याची सक्ती केली जात होती. शिवाय पोर्तुगिजांचा मुघलांकडील कल पाहून छत्रपति शंभुराजांनी गोव्यावर स्वारी केली. मराठ्यांनी पोर्तुगाल्यांची दाणादाण उडवली. हिंदुचे धर्मांतर करणार्या ख्रिस्ती धर्मगुरुंचे कपडे काढून जाहीर धिंड काढली.
मोठ्या सैन्यानिशी आलेल्या मुघल शाहजादा मोअज्जमचाही शंभुराजांपुढे निभाव लागला नाही. अखेर निराश झालेल्या औरंगजेबाने आपला मोर्चा आदीलशाही आणि निजामशाहीकडे वळवला. शेकडो वर्ष जून्या असलेल्या आदीलशाही आणि कुत्बशाहीचा औरंगजेबाने पाडाव केला. त्यामुळे मुघल सैन्याचे बळ वाढले. मराठ्यांविरुध्द मुघलांनी पुन्हा व्यूहरचना सुरु केली. मराठेही तयार होतेच. 18 जानेवारी 1688 रोजी लिहिलेल्या इंग्रजांच्या पत्रात लिहिले आहे की " मुघल सैन्य येणार म्हणून सर्व गडांवर पुष्कळ लोक जय्यत ठेवले आहेत, पण मुघल शंभुराजांवर चाल करुन येण्यास धजत नाही"
कवि कलशासह शंभुराजे संगमेश्वरास आले. येथुन सारी सेना रायगडास परत जाणार होती. इतक्यात मुघलांचा सेनानी शेख निजाम उर्फ मुकर्रबखान याने कोल्हापूर गाठल्याचे वृत्त आले. वेळेआधीच तो संगमेश्वरात दाखल झाला. घनघोर युध्द झाले,पण सैन्याअभावी छत्रपति शंभुराजांना कैद करण्यात आले. भल्याभल्यांना जमले नाही ते मुकर्रबखानाने करुन दाखवले होते. ज्यादिवशी बादशाही छावणी बहादुरगडावर पडली त्याचदिवशी मुकर्रबखानाने औरंगजेबासमोर शंभुराजे आणि कवि कलशास हजर केले. यादिवशी तारिख होती 15 फेब्रुवारी 1689. पण शंभुराजे झुकले नाहीत. तत्पूर्वी बादशाही हुकुमाप्रमाणे त्यांना इस्लामी पध्दतीने "तख्ते कुलाह" चढवून त्यांची अपमानास्पद धिंड काढण्यात आली. साकी मुस्तैदखान आणि ईश्वरदास नागर, मनुची या समकालीन लेखकांनी या विटंबनेचे वर्णन लिहून ठेवले आहे. साकी मुस्तैदखान यावेळी प्रत्यक्ष हजर होता. "मासिर ए आलमगिरी" या ग्रंथात त्याने शंभुराजांच्या अपमनास्पद धिंडीबाबत लिहीले आहे तो लिहितो "काफीर संभाची धिंड म्हणजे आमच्यासाठी रमजान ईदचा सण होता" काफीरांवर विजय दिल्याबद्दल औरंगजेबाने अल्लाहचे अभार मानले. शंभुराजांना इस्लामी पध्दतीने हालहाल करुन मारण्याचा निर्णय त्याने घेतला. दि. 17 फेब्रुवारी 1689 रोजी लालबुंद गरम सळ्यांनी शंभुराजांचे डोळे काढण्यात आले.औरंगजेबाचा दरबारी मुहम्मद हाशिम खाफीखान लिहीतो " बादशाहाला असभ्य बोलणार्या त्या दुष्टांच्या (शंभुराजे) जीभा प्रथम उपटून नंतर त्यांचे डोळे काढण्यात आले" शंभुराजांनी अन्नत्याग केला.
या सर्व शिक्षा इस्लाम धर्मानुसारच देण्यात आल्या होत्या. सऊदी व अन्य इस्लामी देशात आजही अशा शिक्षा दिल्या जातात याचे प्रमाण वाचा इथे-
https://wikiislam.net/wiki/Amputation_in_Islam
https://www.gatestoneinstitute.org/3445/militant-muslims-cutting-out-tongues
मृत्युंजय अमावस्या
दरम्यान बादशाही छावणीने बहादुरगड सोडून पुण्याच्या दिशेने कूच केले. कोरेगाव भीमा येथे मुघलांची छावणी पडली ( 3 मार्च 1689)
छत्रपति शंभुराजांना मृत्युदंड द्यावा असे औरंगजेबाच्या मनात होतेच पण हा *इस्लामिक जिहाद* असल्यामुळे मुस्लिम धर्मगुरुंच्या आदेशानेच तो हा दंड देऊ इच्छित होता औरंगजेबाने सर्व मुस्लिम धर्मगुरुंना बोलावून "या संभाजीने अनेक मुसलमानांना ठार मारले आहे तसेच इस्लामच्या राजवटीतील शहरे उध्वस्त केली आहेत तेव्हा काफीरास मृत्यूदंड द्यावा,अशी सुचना केली. यावर लगेच मुस्लिम काजी आणि मुफ्तींनी शंभुराजांच्या हत्येचा फतवा जारी केला" याची नोंद औरंगजेबाच्या दरबारी असलेल्या साकी मुस्तेदखानाने लिहिलेल्या "मआसिर ए आलमगिरी" या ग्रंथात केलेली आहे.
अखेर मुस्लिम धर्मगुरुंच्या फतव्यानुसार आणि औरंगजेबाच्या आदेशाने दि. 11 मार्च 1689 रोजी छत्रपति शंभुराजे यांना वढू गावच्या रानात ठार मारण्यात आले.
इस्लामी परंपरेप्रमाणे शंभुराजांच्या मृत्युनंतरही औरंगजेबाची वैरभावना नष्ट झाली नाही. शंभुराजांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यात आले. त्यांचे मस्तक औरंगाबादेहून बुरहानपुरपर्यंत मिरवण्यात आले आणि नंतर दिल्लीला नेऊन शहराच्या दरवाजावर लटकवण्यात आले.
अशाच प्रकारे झालेल्या काही हत्या पहा-
1) अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीच्या राजाच्या जावयाला अशाच क्रुर पध्दतीने ठार मारले. त्याची कातडी सोलुन देवगिरीच्या दरवाजावर लटकावले.
2) विजयनगरचा शेवटचा राजा रामराया यांचा पाच मुस्लिम पातशाह्यांनी एकत्र येऊन राक्षसतागडीच्या युध्दात पराभव केला. बादशहाने वयोवृध्द रामरायांचा शिरच्छेद केला. त्यांचे मस्तक भाल्याच्या टोकावर सैन्यात मिरवले गेले. शेवटी अली आदीलशहाने रामरायाचे मस्तक पोखरुन काढले आणि ते विजापूरात एका मोरीच्या तोंडाला अशाप्रकारे बसवले की मोरीतील घाणेरडे पाणी रामरायांच्या तोंडातून बाहेर पडावे.
3) गुरु गोविंदसिंह यांच्या लहान मुलांना भींतीत चिणून ठार मारले. बंदा बैरागींनाही असेच हालहाल करुन मारले.
4) पानिपत युध्दापूर्वी कुत्बशहाने घायाळ झालेल्या दत्ताजी शिंदे यांचा शिरच्छेद केला आणि ते शीर भाल्यावर सैन्यात मिरवले ( त्याने हे कृत्य कुराणनुसार केल्याचा भाऊसाहेबांच्या बखरीत स्पष्ट उल्लेख आहे)
5) कारगिल युध्दाच्या सुरुवातीला कॅप्टन सौरभ कालिया यांचीही पाकीस्तानने अशाच प्रकारे हत्या केली.
महाराष्ट्रातील इतिहास संशोधक डाॅ.जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या "शिवपुत्र राजाराम" या ग्रंथातही पान क्र-20 वर "छत्रपति शंभुराजांची हत्या मुस्लिम धर्मगुरुंच्या फतव्यानेच झाल्याचे" स्पष्ट लिहिले आहे.
साभार - सत्येन वेलणकर, पुणे
लेख व त्यातील माहिती चांगली आहे, माझी अशी सूचना आहे की, लेख लिहून झाल्यावर पोस्ट करण्या आधी एकदा वाचन करुन घेतले तर जास्त चांगले होउ शकते.
या लेखात मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा उच्चारण सगळे मिश्रण झाले आहे. धन्यवाद.
गोविन्द कन्हैयालाल सोमानी
16 Feb 2025 08:17