निजामाच्या राज्यातील जनता रझाकारांच्या जुलमाला कंटाळली होती. दुसरीकडे इंग्रजांच्या दास्यातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी देशभर लढे सुरू होते. हैदराबाद संस्थानातील जनतेला त्यात प्रत्यक्ष सहभागी होता येत नसले तरी गणेशोत्सवातून समाजजागृती तर करता येईल, असा विचार शहरातील तरुणांनी 1925 च्या सुमारास केला. मेळ्यातील पदे आणि देशभक्तीचा संदेश देणाऱ्या गणेशमूर्ती व आरास यांतून लोकांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागवली.
महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या "हैदराबादचा मुक्तिसंग्राम' या पुस्तकात स्वातंत्र्यसैनिक शंकरभाई पटेल यांनी औरंगाबादच्या (आताचे छत्रपती संभाजीनगर) गणेशोत्सवाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्याकाळी जवळपास 40 मंडळांची आरास होती. त्याचबरोबर 11 मंडळांचे मेळे होते. त्यातून कलाकार व मुले रात्रभर सुरेल आवाजात सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय विचारांची गीते गात. औरंगपुऱ्यात राहणारे कर्वे गुरुजी, दत्तोपंत पद्माकर बुवा, बापूराव हरसूलकर, व्यंकटेशराव धारवाडकर, शंकरलाल पुरवार, यमुनाबाई केळकर यांनी ही गीते रचलेली असत. गणेश भक्त मंडळ, हनुमान बाल गणेश मंडळ, बलभीम गणेश मंडळ, रघुवीर गणेश मंडळ, छत्रपती गणेश मंडळ व रोहिदास गणेश मंडळांचे मेळे आणि देखावे बरेच गाजले. भारत विजय गणेश मंडळाद्वारे व्याख्याने आयोजित केली जात. चित्रकार पुंडलिकराव रांजणगावकर यांनी बाबुराव जाधव, नानासाहेब जेधे, हिरुभाऊ जगताप आणि शंकरभाई पटेल यांच्या साह्याने उभारलेल्या महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिना यांच्यातील ऐतिहासिक भेटीच्या देखाव्यामुळे शहरातील वातावरण त्याकाळी तापले होते. शहरासह पैठण वगैरे तालुक्यांतही सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले.
डॉ. शंकरलाल पुरवार आणि त्यांच्या मित्रांनी 1925 मध्ये "जयहिंद गणेश मंडळ' स्थापन करून सराफ्यात देशभक्तिपर देखावे सादर केले. 1929 मध्ये त्यांनी "हिंदमातेची मुक्तता' हा देखावा साकारला. यात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी भारतमातेच्या पायात अडकलेली दास्याची बेडी सोडवत आहेत, असे दृश्य साकारले. इंग्रजरूपी सिंहाचा वध करणारा "गजवाहन गणेश' त्यांनीत साकारला. त्यापुढच्या वर्षी शिक्षणाचे महत्त्व सांगणारा देखावा करताना त्यांनी "पाटी-पेन्सील घेऊन बसलेला गणेश आणि त्याला शिकवणारी मराठमोळी पार्वती' अशी मूर्ती बनवली. या सर्व मूर्ती तेव्हा नाशिकचे प्रसिद्ध मूर्तिकार ग. ना. गर्गे यांच्याकडून बनवून आणल्या जात.
गणपती मंडळांसमोर त्याकाळी मेळे भरत. श्रीगणेश भक्त मेळा, गणेश भक्त मंडळ, जयहिंद गणेश मंडळ राष्ट्रीय विषयांवर पत्रके छापून वितरित करीत असत. गणेश मेळ्यांमधून देशभक्ती जागृत करणारी पदे गायिली जात.
सजलो समरांगणिं जाया।
सौख्य त्यजुनि, जाळुनि माया ।।धृ.।।
गांधी वसत मम हृदयिं तयाला।
वंदुनिया, सत्याग्रह हा भाला।
हातिं धरुनि बघ निघत रणाला।
शोभवीन सुयशें जननीला ।।1।।
अशी मराठी आणि हिंदी पदे स्वतः उत्तम कवी आणि निजामप्रांतीय मराठी साहित्य परिषदेचे सभासद असलेले डॉ. शंकरलाल पुरवार लिहीत. या पदांची पत्रके आणि गणेशमूर्तींची छायाचित्रे श्रीप्रकाश पुरवार यांनी जपून ठेवली आहेत.
गणेश मंडळांमुळे देशभक्ती जागृत होत असल्यामुळे धर्मांध मुस्लिमांचा व निजामाचा विरोध
'औरंगाबाद' म्हणजेच आताचे छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या थाटात गणेश उत्सव साजरी होऊ लागला. गणेश उत्सवाच्या निमित्ताने हिंदू समाज संघटित होऊ लागला. राष्ट्रभक्तीचे वातावरण तयार होऊ लागले. त्यामुळे निजामाला भीती वाटू लागली. हिंदुंवर वचक ठेवू पाहणाऱ्या धर्मांध शक्तीला हे सहन झाले नाही. त्यामुळे गणेश उत्सवाला मुस्लिमांकडून गालबोट लावण्यास सुरुवात झाली. हिंदू-मुस्लिमात तंटे होऊ लागले.
कसबे आळंद येथे गणपती मिरवणूक मशिदीसमोरून नेण्यावरून असाच एक वाद निर्माण झाला. गैर मुसलमानांची कोणतीही मिरवणूक किंवा वाद्य मशिदीसमोरून जाणे म्हणजे इस्लामचा अपमान आहे, असे सांगत मुस्लिम लोकांनी गणपतीच्या मिरवणुकीला विरोध केला. त्या अगोदरही विविध सण उत्सवात मिरवणुक काढण्याला मुस्लिम समाजाचा हेच कारण सांगून विरोध असायचा. बालाजी रथ यात्रेदरम्यानही त्यांनी 'कसबे टेकमाल' येथे विरोध केला होता. 'गणपती बसवणे' ही हिंदूंची नवीनच प्रथा आहे, असे त्यांचे म्हणणे होते. असे वाद जागोजागी उत्पन्न होतायत असे कारण देऊन निजामाने नवीन उत्सव सुरू करण्यासाठी आणि एखाद्या उत्सवामुळे कोणती जात दुखावली जात असेल तर धर्म खात्याच्या प्रमुखांची म्हणजेच मुल्ला मौलवींची परवानगी घेण्याची अट घातली.
हा हुकूम म्हणजे धर्मांधाच्या हाती कोलीतच होते. त्यामुळे कोणता गणपती ‘कदीम’ म्हणजे जुना व कोणता गणपती ‘जदीद’ म्हणजे नवा असे वाद सुरू झाले. 'नव्याने गणपती उत्सव साजरा करणे म्हणजे इस्लामचा अवमान आहे', अशी भूमिका निजाम शासनानेच मान्य केली आणि सार्वजनिक गणेश उत्सवावर बंदी घातली... परंतु हिंदू समाज अनेक ठिकाणी निजामाचे फर्मान मोडीत काढत गणेश उत्सव साजरा करत राहिला…. अश्या प्रकारे हिंदूंच्या सण उत्सवांनी हैदराबाद राज्यात स्वातंत्र्याची अभिव्यक्ती प्रज्वलित केली.
संदर्भ - कहाणी हैदराबाद लढ्याची, लेखक - नरेंद्र चपळगावकर
माहिती साभार: संकेत कुलकर्णी (छ. संभाजीनगर)